मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दिमाखदार सोहळ्याचे आयोजन
दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्रा येथील लाल किल्ल्यातून बाल संभाजीसह घेतलेली ऐतिहासिक सुटका ही भारतीय इतिहासातील अजरामर घटना आहे. या घटनेचे महत्त्व लक्षात घेऊन सांस्कृतिक कार्य विभागाने तिथीनुसार "शिवचातुर्य दिन" म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अधिकृत घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी शिवजन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आग्रा येथे केली.
या दिमाखदार कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख उपस्थित होते. तसेच, विनोद पाटील, एस. पी. सिंग बाघेल, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, आमदार परिणय फुके आणि ‘छावा’ चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारे अभिनेता विकी कौशल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
आग्रा येथील लाल किल्ल्यावर सांस्कृतिक कार्य विभागाच्या सहकार्याने शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी महाराष्ट्र सरकार आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे ऐतिहासिक केंद्र उभारणार असल्याची घोषणा केली.
यावेळी बोलताना सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार म्हणाले की, "ज्या ठिकाणी ‘परिंदा भी पर मार नही सकता‘ अशी सुरक्षा होती, त्या ठिकाणाहून महाराजांनी युक्ती-शक्ती आणि चातुर्याच्या जोरावर सुटका करून घेतली. औरंगजेबाला त्याच्याच दरबारात चपराक देण्याची ही घटना आहे. महाराजांची ही धाडसी कामगिरी संपूर्ण भारतासाठी प्रेरणादायी आहे. त्यामुळे हा दिवस महाराष्ट्रात ‘शिवचातुर्य दिन’ म्हणून साजरा केला जाणार आहे.”
या विशेष दिनाचे औचित्य साधून राज्यभरात विविध सांस्कृतिक आणि ऐतिहासिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये महाराजांची युद्धनीती, गनिमी कावा, भक्ती-शक्ती-युक्ती यांचा गाढा अभ्यास करण्यात येईल. तसेच प्रयोगात्मक नाट्यप्रयोग, परिसंवाद, चर्चासत्रे आणि हेरिटेज वॉकच्या माध्यमातून महाराजांच्या जीवनातील महत्त्वाच्या पैलूंवर प्रकाश टाकण्यात येणार आहे.
शिवाजी महाराजांचे संपूर्ण जीवन हा एक अभूतपूर्व इतिहास आहे आणि त्यांचे कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग नवनवीन उपक्रम हाती घेईल, असेही ॲड. शेलार यांनी यावेळी स्पष्ट केले.